Saturday, May 23, 2020

जगणं

जगणं कशाचं नाव आहे ? 
माहीत नाही ..
पैसे कमावण्याचं ? 
नाव कामावण्याचं ? 
सत्ता मिळवण्याचं ? 
प्रेम मिळवण्याचं ? 
काही कळत नाही ..एकालाच सगळं मिळत नाही ..प्रसिद्धी  आहे ..पैसा नाही ..
पैसा आहे..पण प्रेम नाही ...
सगळं एकदम नाही मिळत ..मग हा गेम चालु राहतो ..
हे मिळालं आता हे मिळवू या..आयुष्याच्या अंतापर्यंत..
माणसं पळतच असतात...मृगजळाच्या मागे..
आपण सामान्य ...
हे सगळं एखाद्यालाच मिळतं.. करोडोमधून एखाद्यलाच..
तो असामान्य ..
काळ हसत असतो...या सगळ्यावर ..
त्याची लाट येते...आणि रेतीवर  मेहनतीने मारलेल्या आयुष्याच्या  सर्व रेघोट्या पुसुन जाते... 
किनारा कोरा होऊन जातो ..
पुन्हा नवीन रेघोट्या मारण्यासाठी ...

- संजीवन म्हात्रे ( मनातलं -005 ) 

Wednesday, May 20, 2020

लॉकडाउन -04 ( मनातलं -004 )

नमस्कार ..!! 
लॉकडाऊन-4 सुरू आहे. पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे.  मे महिन्याच्या शेवटी नेहमी पाऊस, वादळ घेऊन ढगांची दाटी व्हायची.. पण यावर्षी मात्र आपण जागतिक मंदी, बेकारी आणि महामारी च्या  छायेत वावरत आहोत.. !  असो, हे सर्वांनाच माहिती आहे.  काळ कठीण आहे. अगोदरच दोन महिन्यांचा संघर्ष आपण केलाच आहे.  कदाचित हे आणखी काही दिवस किंवा महिने चालेल, पण प्रत्येक रात्री ला पहाट जोडलेली असते तसे या संकटातून आपण जरूर बाहेर पडू ..!! हळूहळू  सावरू आणि पहिल्यासारखे वावरु ..!! तोपर्यंत ...
घरातच वावरा आणि 
स्वतःला सावरा...!! ( #मनातलं ) 
- संजीवन म्हात्रे

Sunday, May 10, 2020

श्री राम...!

               राम ..! आदर्श जीवन,आदर्श राजा, आदर्श भाऊ, आदर्श मुलगा, आदर्श पती ....असे सर्व आदर्श ..यांची प्रतिकृती म्हणजेच राम ..! राम हा शब्द उलटा केला तर ' मरा' होतो.  याचा अर्थ 'राम' म्हणजेच जीवन..!! संपूर्ण जीवनभर आपण 'राम' होण्याचा म्हणजेच चांगलं किंवा आदर्श होण्याचा विचार करतो,  राम होण्यासाठी च जगतो. आपण आपल्यातले दुर्गुण कमी करून पूर्णत्वाकडे जाण्याचा  प्रयत्न करतो आयुष्यभर ..!! पूर्णत्वाचा आदर्श आपल्या संस्कृतीने आपल्या समोर ठेवला आहे - 'राम' ..!! एखाद्याच्या जीवनात काहीही उरले नसेल तर, आपण त्यात काही 'राम' उरला नाही असे म्हणतो.  'राम' याचा अर्थ जीवनाचे सार,जीवनाचे मर्म , आणि जीवनाचा अर्थ...!!  एकमेकांना भेटलो तरी अभिवादन करताना आपण 'राम राम' म्हणतो.  त्याचा अर्थ आपल्याला क्षणोक्षणी 'राम' स्मरावा ...यासाठी हा खटाटोप..!!  राम नामाने आदर्श जीवनाचे स्मरण करणे, आणि मेल्यावर सुद्धा 'राम नाम सत्य आहे' असं म्हणतात आपण जगाचा निरोप घेतो महात्मा गांधींनी सुद्धा शेवटच 'हे राम'  हे शब्द उच्चारले होते.
                  रामायण आपल्याला सर्वांनाच माहित  आहे. प्रभु रामचंद्रांना आपण ईश्वर मानतो. मानव रूपातील हा विष्णूचा अवतार ! एखाद्या मनुष्याप्रमाणेच त्यांना सर्व कर्तव्ये पार पाडावी लागली. रामायणाने आपल्यालाच नव्हे, भारतभूमीलाच नव्हे तर संपूर्ण जगताला ' मानवी जीवन कसे जगावे ' याचा एक आदर्श घालुन दिला आहे . राम जोपर्यंत  अयोध्येत होते, तोपर्यंत 'राजपुत्र राम', 'श्रीराम' म्हणून त्यांचा उल्लेख आहे.  परंतु चौदा वर्षांचा वनवासानंतर आणि रावणाचा वध करून आल्यानंतर, राम हे 'मर्यादा पुरुषोत्तम' आणि  'भगवान राम' म्हणून ओळखले जाऊ लागले.  कल्पना करा, त्यांचा  राज्याभिषेक होणार होता आणि अचानक त्यांना 14 वर्ष सपत्नीक वनवासात जावे लागले,  आपण किती आकांडतांडव केला असता, परंतु राज्याभिषेक होणार होता म्हणून ते आनंदी नव्हते आणि वनवासात जावे लागले म्हणून ते दुःखी नव्हते.  आलेल्या प्रत्येक गोष्टीला ते अत्यंत स्वीकार भावनेने सामोरे गेले.  आणि चौदा वर्षांचा खडतर वनवास भोगून, रावणाशी युद्ध लढून आणि जिंकून 'भगवान राम'  म्हणून परत आले...!!
                      प्रभू रामचंद्र यांच्या वर संकटावर संकटे कोसळली. 14 वर्षे वनवास,  पित्याचा मृत्यू, पत्नीचे अपहरण, लक्ष्मणाला आलेली मुर्च्छा, रावणाबरोबर घनघोर युद्ध.... अनेक प्रसंग राम या शब्दाची कसोटी पाहतात. मला काही वैशिष्ट्ये जरूर नमूद करावीशी वाटतात.  रावणाबरोबर लढण्यासाठी  बलशाली  वाली ला सोबत न घेता,  सुग्रीव  ला सोबत घेतले. वाली इतका बलाढ्य होता की त्याने रावणाला पराभूत केले होते.  तो इतका बलशाली होता की एखाद्या 'वाली' नाही म्हणजेच आधार नाही हा वाक्प्रचार वाली चे महत्व सांगून जातो.  परंतु वाली ने स्वतःच्या भावाच्या पत्नीचे अपहरण  केले, म्हणून प्रभू रामचंद्र यांनी वाली चा वध केला. बलाढ्य  परंतु असत्य असणाऱ्या वालीची बाजू न घेता सत्य असणाऱ्या सुग्रीवाची बाजू घेतली. सत्याच्या सोबत  राहायला ताकद लागते.  हनुमंत, जांबुवंत, सुग्रीव, नल, निल, अंगद असे अनेक जबरदस्त योद्धे  निर्माण करून त्यांच्यात नेतृत्वागुण विकसित केले.  रावणाकडे जबरदस्त ताकत महान योद्धे, सक्षम राक्षसी  सेना असे सर्व होते. परंतु सत्य कधीही ही पराभूत होत नाही.  'सत्यमेव जयते' हे ब्रीद वाक्य आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण जीवनचरित्रातून मिळते.  कोणत्याही प्रसंगात धीरगंभीर, स्मितहास्य करीत सामोरे जाणाऱ्या प्रभु रामचंद्र, प्रचंड पराक्रमी, निश्चयाचा,कर्तव्याचा परमोच्च बिंदू च आहेत ..!! राम राजा असून सुद्धा शबरीची उष्टी बोरे खातात, केवटला जवळ करतात, सुग्रीवाला राज्य मिळवून देतात आणि रावणाचा वध सुद्धा करतात...!!  म्हणूनच 'मर्यादा पुरुषोत्तम', 'भगवान राम' असा  आदर्श भारतीय संस्कृतीचा वारसा आपण सांगतो.  कठीण प्रसंगात अत्यंत शांत राहणाऱ्या प्रभू रामचंद्र, उत्कृष्ट सेनानी, महापराक्रमी राजा, दयाळू ,शांत असे हजारो-लाखो गुण रामायणातील एकेक प्रसंगांवर आपल्याला सांगता येतात. 
         लहानपणी आईनं सांगितलं होतं की भुताची भीती वाटली तर 'राम राम'  म्हणायचं ....भुतं पळून जातात इतका राम आपल्या आयुष्यात आहे, नव्हे  तो तर आमच्या जीवनाचा आधार आहे ...!! 
जय श्रीराम !!!
  • संजीवन म्हात्रे 

Friday, May 1, 2020

वाद्य ..!

मनातलं !! ,
एका बाजूनी वाजणारी ही वाद्य काळाच्या पाडद्याआड गेलीत ...किंवा त्यांचा उपयोग फार नाही राहिला..! सतत एकच आवाज करणारी वाद्य वेडी ठरलीत ..!! उलट कल ओळखून दोन्ही बाजूनी वाजण.. आज समझदारीचं , बुद्धिमत्तेच लक्षण झालंय..!! ज्यांना हे जमत नसेल अशा वाद्यांना कुठेही थारा नाही ..!! वाद्य कशी पाहिजेत आज...? एकातच सगळ वाजलं पाहिजे, आवाज बदलता आले पाहिजेत, काळ ओळखुन पट्टी बदलता आली पाहिजे आणि हो सर्वात महत्वाचं ...कधी कधी वाजण्याची क्षमता असून गप्प बसता आलं पाहिजे..! अशी वाद्य एकमेकांना धरून वाजत राहतात वाद्यवृंदात ..त्यांचा स्वतःचा आवाज  वाद्यवृंदात निरर्थक आहे  हे त्यांना ही माहीत असत... तरीसुद्धा...!  
 - संजीवन म्हात्रे ( मनातलं -004 )