मार्च महिना संपला..! गेले पंधरा दिवस घरीच बसलोय. मीच काय, सारे जग सुद्धा घरात बसून आहे. ' लॉक डाऊन' हा शब्द दोन महिन्यापूर्वी कुणाला माहितीदेखील नसेल. आता दिवस-रात्र हाच विषय अखिल मानव जातीमध्ये बोलला जातोय. प्रचंड वेगाने धावणाऱ्या मानवाच्या वेगाला खिळ बसलीय. अचानक धावणाऱ्या ट्रेनला, कुणीतरी साखळी ओढावी आणि ती ट्रेन रस्त्यातच थांबावी, अशी मानवाची गत झालीय. जीवनाचा वेग पूर्णपणे मंदावला, नाही तर तो पूर्णपणे थंडावला आहे..! आणि हे मानवजातीला सहन होत नाही आहे. एक विषाणू ने जगभर थैमान घातले आहे. मानव आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढतोय. आता सर्वांचा शत्रू एकच आहे. हे अमेरिका - चीन, इराण-इराक, भारत - पाकिस्तान असे युद्ध नाही. हे नॉर्डीक - ज्यु, हिंदू-मुस्लीम,असा धार्मिक, वांशिक , जातीय , सीमावाद, भाषिक वाद , असा कसलाही मानवी संघर्ष नाही . एका बाजूला सात अब्ज मानव आपला आत्तापर्यंत विकसित झालेलं संपूर्ण प्रगत विज्ञान घेऊन उभे आहे तर विरुद्ध बाजूला आहे डोळ्यांनाही न दिसणारा क्षुद्र विषाणू ..!! - कोरोना ..!!
शत्रु न दिसणारा, क्षुद्र वाटणारा असल्यामुळे, माणूस गोंधळात सापडलाय. कसं लढावं ~ कुणाशी लढाव ? कधी लढावं ? आणि का लढावे हे देखील त्याला अजून पूर्णपणे कळालेलं नाही. त्याला निष्क्रिय 'घरात फक्त थांब' आपण हे युद्ध जिंकू हेच समजत नाही. कारण शत्रूला अजून त्याने पूर्णपणे ओळखून घेतलेला नाही, समजून घेतलेलं नाही. परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर मानवजात विनाशाच्या जवळ जाऊ शकते आणि तरीही आपण अजूनही 'उद्यासाठी भाजी मिळणार की नाही'? या विवंचनेत आहोत.आम्ही एकत्र जमणार, नमाज पढणार अशा दरपोक्ती फोडत आहोत .माझ्या मते देश हाच सर्वात मोठा देव आणी देशभक्ती हीच सर्वात महत्त्वपूर्ण भक्ती..! मी स्वतः अत्यंत आस्तिक आहे. परंतु आज आवश्यकता आहे, मानवाच्या प्रचंड संयमाची, निर्धाराची आणि आत्मशक्तीची ..!!
हा लढा जिंकणे अशक्य नाही..! आपण जिंकू ..! पणे हे सर्व सहज होईल हे मात्र विसरून जा. कोरोनाने जग आर्थिक मंदीच्या लाटेवर आणून सोडले आहे . त्यामुळे पुढे आर्थिक संघर्ष उभा राहील. म्हणुन माणसाने आता माणसासारखे वागून माणुसकी हाच केवळ धर्म मानावा लागेल. अनेक समाजोपयोगी काम करणारे निस्वार्थी मानवी हात, संघटना पुढे याव्या लागतील. पोलीस वैद्यकीय यंत्रणांना मजबूत करावे लागतील. अंदाधुंदी, अराजक माजणार नाही अशी व्यवस्था ठेवावी लागेल. चोख कायद्याचे राज्य निर्माण केले आहे, ते शाश्वत करण्यासाठी शासनाला आणि शासकीय यंत्रणांना मजबूत करावे लागेल. शासनाला कोणतीही कठोर निर्णय देशाच्या आणि मानवजातीच्या भल्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी घ्यावे लागतील. आणि त्याची निर्दयपणे अंमलबजावणी करावी लागेल.
मी एकही दिवस घरी न थांबणारा, सतत काम करणारा, स्वतःला बिझी म्हणून धन्यता मानणारा, सतत भ्रमण करणारा...परंतु आज शांत घरी बसलोय ..!! मी मानव संहाराच्या दैत्याची पावलं ओळखलीत ..! मी स्वतःला निक्षून सांगितले आहे, स्वयंशिस्तीने मी याचा मुकाबला करेन..! कारण मला जगायच आहे आणि माझ्या कुटुंबियांना , नातेवाईकांना, समाजाला आणि संपूर्ण देशाला सुखरूप बघायच आहे. पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आदर्श असे संस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव मला बघायाचे आहेत. मला माझा देश समृद्ध बघायचा आहे. आणि म्हणूनच मी सध्या मला घरात कोंडून घेतले आहे .आणि सर्वच विनंती करतो ह्या शत्रूला पूर्णपणे समजून घ्या म्हणजे त्याचा नीट मुकाबला करता येईल आणि त्याला परास्त करता येईल..! संयम, स्वयंशिस्त आणि पराकोटीची देशभक्ती खूप महत्त्वाची ..!! हीच आपली हत्यारे आहेत..! वैद्यकीय शास्त्र यावर लवकरच उपाय शोधून काढेल आणि आज भस्मासुर वाटणारा कोरोना मानवाच्या पुढे किडा-मुंगी समान वाटेल ..!! परंतु तोपर्यंत या मानवजातीला जगवणं, तगवण महत्त्वाच आहे ..! आणि शेवटी 'जान है तो जहाँन है ..!! शेवटी एवढेच स्वयंशिस्तीने घरी राहु या !! लढू या ..! विजय होऊया ..!!
धन्यवाद ..!!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे