Wednesday, February 10, 2016

बहुत जनासी आधारू - रवीशेठ पाटील

बहुत जनासी आधारू - रवीशेठ पाटील
                वहाळ चे साई मंदिर .. दर गुरुवारी पाच हजार पेक्षा जास्त जमणारे साईभक्त...गेली चार वर्ष सातत्याने त्या प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान करण्यासाठी धडपडणारी एक व्यक्ती ..प्रत्येकाला आवर्जून भेटून... नमस्कार करून .." साईभंडारा  घेतल्याशिवाय जाऊ नका " असे विनवणी करणारी ...प्रत्येक कलाकार पुढे गेला पाहिजे ..त्याला रंगमंच मिळाला पाहिजे....प्रत्येक तरुणाला नोकरी मिळाली पाहिजे ...प्रत्येक व्यावसायिकाला संधी मिळाली पाहिजे ...प्रत्येक खेळाडू ला उच्च स्तरावर पोहोचला पाहिजे  ...प्रत्येक गरिबाला रोजगार ...पिडीताना न्याय ....आणि समाजातील सर्वांनाच आनद मिळाला पाहिजे ...त्याचं भलं झालं पाहिजे म्हणून एक व्यक्ती अहोरात्र...समाजामध्ये विविध स्तरावर काम करतेय ...सर्वाना त्यांच्याबद्दल प्रेम , आदर आपुलकी वाटते ...असे संपूर्ण रायगड ,नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सर्वांच्या मुखी असलेले नाव म्हणजेच कोकणरत्न रवीशेठ पाटील ...! आज त्यांचा वाढदिवस ..! त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या सर्व चाहत्यांचा वतीने केलेला हा लेखप्रपंच ...!
                 माझी आणि त्यांची भेट त्यांच्याच कार्यालयात पहिल्यांदा झाली. मी नुकताच एस.व्ही.एस. टेलीकॉम नावाचा व्यवसाय सुरु केला होता. माझ्या कडे कुणीही काम करत नसल्यामुळे मीच त्या कंपनीचे मार्केटिंग करत फिरत होतो. वणवण भटकून काहीही यश मिळत नव्हते..अशा वेळी माझे मित्र राजू मुंबईकर यांनी 'तुम्ही रवीशेठ ना भेटा ' असे सुचविले ...मी घाबरतच त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेटलो.( कारण त्या अगोदर अनेकांनी मला सेल्समन समजून अपमानास्पद वागणूक दिली होती ), परंतु मला इथे वेगळाच अनुभव आला ...रवीशेठ पाटील  आणि त्यांचे सहकारी बाळाराम पाटील यांनी माझ्या कंपनी विषयी सर्व ऐकून घेतले आणि माझ्याविषयी माहिती विचारली आणि या प्रोडकट ची सर्वात जास्त किमत विचारली. त्यांनी  माझ्या व्यवसायाला आधार तर दिलाच परंतु अनेकांना 'आपला आगरी मुलगा काहीतरी धडपड करतोय त्याला पुढे जायला मदत करा असे आवाहनही  केले .पहिल्या भेटीतच मला त्यांच्या विषयी खूप आदर वाटू लागला.
                   आणि दुसरी भेट खरच नमूद करण्यासारखी ...वहाळ येथील आगरी साहित्य संमेलन ..अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल ...साहित्यिकांना तर विसरताच येणे शक्य नाही ..उत्तम आयोजन ..सर्व कवी, लेखक, साहित्यिक , कलाकार,नेतेमंडळी , पाहुणे यांची उत्तम बडदास्त ...आणि सर्वांसाठी झटणारी एकमेव व्यक्ती - रवीशेठ पाटील ..माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस ..समारोपाला एक तासाचा मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी ..जॉनी रावत ( पोट धरून हसा ), दिलीप खन्ना ( हास्यदरबार ) आणि वेळ शिल्लक राहिला तर मला संधी ..! पण रवीशेठ पाटील यांनी वेळ झालेला असताना सुद्धा मला १० मिनिटे कार्यक्रम करण्याची संधी दिली ...आणि त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांसमोर  'संजीवन म्हात्रे' हे नाव आलं...लगेच रवीशेठ पाटील यांनी मला 'कर्नाळा महोत्सव' मध्ये कार्यक्रम करण्याची संधी दिली ..'आपला कलाकार पुढे गेला पाहिजे ...म्हणून सर्वच कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे रवीशेठ ..सर्वांचे आदराचे स्थान आहेत. प्रत्येक समारंभ , सांस्कृतिक कार्यक्रम , अनेक आंदोलने यामधून प्रत्यके वेळी माझ्या नावाचा हट्ट रवीशेठ पाटील यांनी धरला आणि आज ' संजीवन म्हात्रे " हे नाव सर्वश्रुत होण्यात ' रवीशेठ पाटील " यांचा खूप मोठा वरदहस्त माझ्यावर आहे हे आपण सर्वजण जाणताच...!
                   नम्रपणा हा त्यांचा खूप मोठा गुण आहे. सर्वांबरोबर आदराने, प्रेमाने बोलणं ...त्यांची विचारपूस करणं ...नमस्कार करणं ...हि त्यांना भेटल्यावर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ..! आपल्या ओळखीच्या माणसांबरोबर ते चांगलं वागतात ..परंतु अनोळखी माणसांबरोबर सुद्धा ते तेवढ्याच आदराने वागतात. गरिबीतून संघर्ष करत आलेले रवीशेठ आपल्या गरिबीला विसरलेले नाहीत. त्यांच्या बालपणीच्या सवंगड्याना आताही हे तसेच भेटतात. माणसाना जोडण आणि जोडून ठेवण हि त्यांच्या स्वभावाचे खास वैशिठ्य आहे . नेहमी हसतमुख असणारे रवीशेठ ...आपल्या हास्यविनोदाने गंभीर प्रसंग सुद्धा हलका करतात..हे मी जवळून पाहिलेले आहे. सामाजिक , सांस्कृतिक , खेळ , अध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय या सर्वच क्षेत्रामध्ये रवीशेठ पाटील यांच्याविषयी सर्वांच्याच मनात आदर आहे.
             कोणत्याही संकटाला  धावून येणारी व्यक्ती आणि कोणताही प्रसंग सामंजस्याने हाताळणारी व्यक्ती म्हणू रवीशेठ पाटील यांची ख्याती आहे. 'पोलीस मित्र " असणारे रवीशेठ पाटील सर्व पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत असतात. सामाजिक सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी या भूमिकेतून पोलिसांना सर्वतोपरी मदत काणारे रवीशेठ, समाजातील कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन सर्वसमान्य माणसाना सतत मदतीचा हात पुढे करत असतात. उरण विभागात सतत निर्माण होणारी वाहतूक समस्या आणि त्यामधून होणारे सर्वसामान्य माणसांचे  हाल त्यांना स्वस्थ  बसू देत नाही. हि वाहतूक कोंडी सुटावी म्हणून आपल्या परीने ते सारखे प्रयत्न शील असतात.
              अध्यात्मिक क्षेत्रात रवीशेठ पाटील हे नाव  संपूर्ण परिसरात गाजत आहे. आपल्या साईभक्तीने सर्व साई भक्तांच्या गळ्यातील  ते ताईत बनले आहेत. साई मंदिरांच्या माध्यमातून त्यांनी उरण , पनवेल , नवी मुंबई परिसरात एक अध्यात्मिक चळवळ सुरु केली आहे. दर गुरुवारी होणाऱ्या मंदिरातील कार्यक्रमाला हजारों साई भक्तांची गर्दी उसळलेली असते. इतके लोक एकत्र येऊन सुद्धा गेली तीन वर्ष एकही अनुचित प्रकार कधी घडला नाही याचे सर्व श्रेय रवीशेठ पाटील यांनाच द्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष घालून आपल्या सर्व सहकार्यांना ते एक आदर्श घालून देतात. साई मंदिरामध्ये " साई सन्मान " पुरस्कार सुरु करून विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करू त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम रवीशेठ पाटील यांनी केले आहे आणि ते अविरत सुरु आहे. " वाचावी ज्ञानेश्वरी घरोघरी " सलग ७२ तासांचा भजन गायनाचा विक्रम ' असे अनेक उपक्रम त्यांनी आयोजित  करून आध्यात्मिक चळवळीला एक वेगळे बळ निर्माण करून दिले.
              सांस्कृतिक क्षेत्रात रवीशेठ पाटील यांच्या मुळे अनेक कलाकार पुढे आले आहेत. हरीश मोकल , गुरु कदम , संजीवन म्हात्रे अशी कितीतरी नावे सांगता येतील. अनेक भजन गायक , वादक , कवी , नाट्य कलाकार , शाहीर , नकलाकार , लेखक या सर्वाना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं मोठ काम रवीशेठ पाटील यांनी केल आहे. अनेक गावा गावांमध्ये भजन मंडळे स्थापन झाली आणि काहींनी लोप पावलेली हि कला पुनर्जीवित केली ..'कर्नाळा'  वाहिनी आणि आता सुरु झालेली 'साई श्रद्धा'  वाहिनी यांच्या माध्यमातून रवीशेठ पाटील यांनी सर्व कलाकारांना समाजासमोर आणण्याचा जणू विडाच उचलला आहे. आजच्या तरुणांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कायम राहावा म्हणून प्रशांत देशमुख , गणेश शिंदे , शिवशाहीर वैभव घरत या सर्वांच्या माध्यमातून ते शिवचरित्र समाजासमोर ठेवत असतात. ' मला शिवाजी व्हायचय " या माझ्या नवीन कार्यक्रमाला प्रोत्साहन ' रवीशेठ पाटील' यांचेच ..!
              स्पोर्ट्स या क्षेत्रात रवीशेठ पाटील यांचे भरीव योगदान आहे. गेली अनेक वर्ष " कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमी " चे उपाध्यक्ष असलेले रवीशेठ पाटील सन्माननिय माजी आमदार विवेक पाटील यांच्या 'विजन २०२०  हे स्वप्न साकारण्यात त्यांनी वाहून घेतले आहे. भारताला एकतरी सुवर्णपदक मिळवून देण्याचे आमदार विवेक पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. रायगड जिल्ह्याचे खो खो च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक तालुका पातळीवरील सार्ध आयोजित करून अनेक प्रतिभावंत  खो खो खेळाडू शोधून काढून त्यांना जिल्हा स्तरावर  आणि राज्य स्तरावर नेण्याचे काम रवीशेठ करत आहेत.  याबरोबर कब्बड्डी आणि सर्वच मैदानी खेळ यांना रवीशेठ सतत प्रोत्साहन देत असतात.
             शैक्षणिक क्षेत्रात रवीशेठ पाटील यांनी  'नवी मुबई एविएशन अकॅडेमी ' ची स्थापना आपल्या तरुण सुशिक्षित सहकारयाना हाताशी धरून केली.  सर्व प्रकल्पग्रस्तांना येणाऱ्या 'आंतराष्ट्रीय विमानतळ " या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरी मिळाव्या  आणि त्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून सिडको बरोबर सतत वाटाघाटी करून यशस्वी प्रयत्न केले . गेली वर्षभर सतत ते या गोष्टीच पाठपुरावा करत आहेत. आपल्या प्रकल्पग्रस्त बांधवाना ,तरुण पिढीला ,  तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण , सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळावे म्हणून अनेक योजना ते सतत आखत असतात.
             हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल एक रवीशेठ पाटील हे एक उत्तम गायक आहेत. कर्नाळा वाहिनीवर त्याची झलक अनेकदा दिसली आहे. मनमिळावू आणि भावनिक असलेले रवीशेठ " बने चाहे दुश्मन जमाना  हमारा ' हे गाताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू मी पहिले आहेत. उत्तम केलेची जाण असलेले रवीशेठ कलाकारांचे उत्तम पारखी आहेत. साहित्य, कला , संगीत , अध्यात्म , सामाजिक , शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात रमणारे रवीशेठ पाटील हे सर्व तरुणानी आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व आहे. परिपूर्ण जीवन कसे जगावे याचा आदर्श त्यांच्याकडून मिळतो. अशी व्यक्ती मित्र , सखा आणि मार्गदर्शक  म्हणून माझ्या आयुष्यात आहे हे माझे भाग्य समजतो. आजच्या वाढदिवस् प्रसंगी  मी परमेश्वराकडे त्यांना उत्तम आरोग्य , संपदा , आणि दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो  ..!
- हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

No comments:

Post a Comment